क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या एकाच कुटुंबियांची फसवणुक

47 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाला अटक

0

राजू परुळेकर
10 जून 2025
मुंबई, – क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीवर भरघोस रिटर्न देण्याच्या आमिषाने एकाच कुटुंबातील पाचजणांची सुमारे 47 लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या वॉण्टेड व्यावसायिकाला समतानगर पोलिसांनी अटक केली. कार्तिक कमल शर्मा असे या 33 वर्षीय आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कार्तिकने मुंबईसह पुण्यातील अनेकांना गुंतवणुकीच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

आशिष केवल नरुला हे कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत असून त्यांचा शेअरमार्केटसंबंधित व्यवसाय आहे. सप्टेंबर 2024 त्यांची एका मित्राच्या पार्टीत कार्तिक शर्माशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांना कार्तिक हा व्यावसायिक असून त्याची स्वतची कंपनी असल्याचे समजले होते. ही कंपनीत कन्स्लटन्सीचा व्यवसाय करत होती. कार्तिकने त्याच्या कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केली असून या गुंतवणकीवर त्यांना चांगला रिटर्न मिळत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनीही त्यांना त्याच्या कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.

तीन लाखांच्या गुंतवणुकीवर त्यांना प्रति महिना 86 हजार 255 रुपये तर सात हजार बोनस म्हणून देण्याचे आश्वासन दिले होते. अल्पावधीत कार्तिक हा त्यांचा मित्र झाला होता. ऑक्टोंबर 2024 रोजी ते त्याच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्याच्या कार्यालयात आठ ते दहा कर्मचारी काम करत होते. तिथेच त्यांची भेट झाली आणि त्याने पुन्हा त्यांना गुंतवणुकीची ऑफर दिली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. 22 नोव्हेंबर 2024 ते 25 मार्च 2025 या कालावधीत त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेघा नरुला, वडिल केवलनाथ नरुला, सासरे राजकुमार गिल्होत्रा, मेहुणा युवराज गिल्होत्रा यांनी त्याच्याकडे टप्याटप्याने सुमारे 93 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना 46 लाख रुपये रिटर्न केले होते. मात्र उर्वरित सुमारे 47 लाख व्याजासहीत परत केले नव्हते.

मार्च 2025 पासून त्याच्याकडे पैसे येणे बंद झाले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा सुरु केली होती. त्याच्याकडून सतत टोलवाटोलवी केली जात होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांना कार्तिकने पुण्यात अनेक लोकांना गुंतवणुकीवर आकर्षक रिटर्न देण्याच्या आमिषाने गंडा घातला होता. हा प्रकार त्याने कार्तिकला सांगून त्याच्याकडून त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्याने त्याचे कॉल घेणे बंद केले होते. मोबाईल स्विच ऑफ केला होता. तो घरासह कार्यालय बंद करुन पळून गेला होता. याच दरम्यान त्याने त्याचे सर्व सोशल अकाऊंट बंद केले होते.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच मे 2025 रोजी आशिष नरुला यांनी समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून कार्तिक शर्माविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या कार्तिक शर्माला पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या तपासात कार्तिक शर्माने मुंबईसह पुण्यात अनेकांना गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातल्याचे उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधीच्या घरात जात असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page