शेअर गुंतवणुकीवर गंडा घालणार्‍या तीन आरोपींना अटक

बोगस कंपन्यांच्या नावे बँक खाती उघडून सायबर ठगांना दिले

0

अरुण सावरटकर
14 मे 2025
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नामांकित आयटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याला सुमारे 69 लाखांना गंडा घालणार्‍या टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सचिन सिताराम सावंत, उमेश दिनेश विश्वकर्मा आणि विभम अशोक मिश्रा अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने बोगस कंपन्यांच्या नावाने विविध बँकेत 50 हून अधिक खाती उघडून या खात्याची माहिती ऑनलाईन फसवणुक करणार्‍या सायबर ठगांना पुरविल्याचा आरोप आहे. याच बँक खात्यात आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणुकीची रक्कम जमा झाली असून त्यांना सायबर ठगांना लाखो रुपये कमिशन म्हणून दिल्याचे उघडकीस आले आहे.

संजय किशोर प्रजापती हे बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असून एका नामांकित आयटी कंपनीत कामाला आहे. त्यांचे स्वत डिमॅट अकाऊट असून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीची आवड आहे. त्यामुळे ते अधूनमधून शेअरमध्ये गुंतवणुक करतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत ते सोशल मिडीयावर शेअरसंदर्भातील माहिती पाहत असतानात्यांना एक लिंक दिसली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एका शेअर ट्रेडिंग कंपनीची माहिती दिसून आली. काही वेळानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक संबंधित कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये ऐश्वर्या शास्त्री आणि आदित्य शर्मा हे दोघेही अ‍ॅडमिन असल्याचे तसेच 61 सभासद सक्रिय असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले होते. ग्रुपमध्ये नियमित शेअरसंदर्भातील चढ-उताराची माहितीसह कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास सभासदांना जास्तीत जास्त फायदा होईल याबाबत माहिती दिली होती.

काही दिवसांनी त्यांना ऐश्वर्याने त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेअर टे्रडिंग करण्याचा सल्ला देताना त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी 2 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 या कालावधीत विविध शेअरमध्ये लाखो रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड प्रॉफिट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना ती रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. याबाबत त्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांना समोरुन हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांना काही रक्कम आधी भरावे लागतील असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन ट्रान्स्फर केले होते.

मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही त्यांना त्यांची मूळ रक्कमेसह प्रॉफिटची रक्कम मिळाली नाही. शेअरमध्ये गुतवणुकीसह पैसे स्वतच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांनी सुमारे 69 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र कुठलाही परताचा तसेच मूळ रक्कम न देता संबंधित सायबर ठगांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी बोरिवली, कांदिवली आणि मिरारोड येथून सचिन सावंत, उमेश विश्वकर्मा आणि विभम मिश्रा या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत उमेश हा एका खाजगी बँकेत, सचिन कंत्राटदार तर विभम हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सचिनने स्वतसह कुटुंबियांच्या कागदपत्रांच्या आधारे विविध बँकेत बोगस कंपन्यांच्या नावाने खाती उघडले होते. या बँक खात्याची माहिती त्याने ऑनलाईन फसवणुक करणार्‍या सायबर ठगांना दिली होती. या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांची फसवणुक रक्कम जमा होत होती. त्यामुळे त्याने त्याच्या परिचितासह मित्रांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन इतर बँकेत खाती उघडले होते.

याकामी त्याला उमेश आणि विभम यांनी मदत केली होती. प्रत्येक खाते उघडण्यासाठी तसेच खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. गेल्या काही महिन्यांत त्यांना कमिशन म्हणून लाखो रुपये मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही टोळी सायबर ठगांना बँक खाती उघडून देण्यास मदत करत होती. त्याचा वापर नंतर फसवणुकीसाठी होत असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page