मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – टोरोंटोनंतर मुंबई शहरात आणखीन एक कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे गाजर दाखवून एका खाजगी कंपनीने तब्बल 184 गुंतवणुकदारांना सुमारे 45 कोटी रुपयांना गंडा घातला होता. हा घोटाळा उघड होण्यापूर्वीच कंपनीतील दहा संचालक पळून गेले असून त्यांच्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि महााष्ट्र ठेवीदाराच्या कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आहे. अमरदिपकुमार सिंग, अनिता कुमारी,पवन ओडेला, समीर नायर, संदीपकुमार, आर्यन सिंग, योगेंद्र सिंग, काव्या नलुरी, अविनाशकुमार आणि ए. जी एस नायर अशी या दहा आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अंधेरीतील मनिषनगरची रहिवाशी असलेली स्मिता निरज दुबे ही महिला व्यावसायिक आहे. आरोपी तिच्या परिचित असून त्यांच्या मालकीची कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी आहे. याच कंपनीत संबंधित सर्व आरोपी संचालक पदावर काम करतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्यांनी तिला त्यांच्या कंपनीच्या एका आकर्षक योजनेची माहिती दिी होती. फॅलकॉल इन्वाईस डिस्काऊंटींग नावाच्या या योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना बारा ते अठरा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ही योजना आवडल्याने तिने त्यात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे तिने त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केली होती. मात्र गुंतवणुक रक्कमेवर तिला दिलेल्या मुदतीत परताव्याची रक्कम मिळाली नाही.
याबाबत विचारणा केल्यानंतर कंपनीचे संचालक तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. ते सर्वजण सतत टोलवाटोलवी करत असल्याने तिने त्याची शहानिशा सुरु केली होती. त्यात तिला संबंधित आरोपींनी तिच्यासह अनेकांना त्यांच्या कंपनीतील योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. 25 जुलै 2024 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत तिच्यासह 184 गुंतवणुकदारांनी त्यांच्या कंपनीत 45 कोटी 41 लाख 13 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर कोणालाही परताव्याची रक्कम देण्यात आली नव्हती. त्यांच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच अनेकांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या गुंतवणुक रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी कोणालाही गुंतवणुकीची रक्कम न देता पलायन केले होते.
हा प्रकार स्मिता दुबेसह इतर गुंतवणुकदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत कंपनीच्या संबंधित संचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांना त्यांना आंबोली पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर स्मिता दुबे यांच्या तक्रार अर्जानंतर सोमवारी कंपनीच्या दहाही संचालकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास हाती येताच पोलिसांनी पळून गेलेल्या दहाही संचालकाच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.