मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मे 2025
मुंबई, – तीन दिवसांपूर्वी विनाकारण वाद काढून एकाच कुटुंबातील तिघांवर पाचजणांच्या एका टोळीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात रितेश प्रेमसिंग विश्वकर्मा, त्याचे वडिल प्रेमसिंग विश्वकर्मा आणि भावोजी असे तिघेही झाले होते. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीसह दोघांना ठाण्यातील जंगलातून विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. दत्ता मंगेश पाटील ऊर्फ शेरु आणि मनिष सनातन साहू ऊर्फ चिंटू अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपीची संख्या आता चार झाली आहे. यापूर्वी याच गुन्हयांत महेश कृष्णा महाराणा आणि प्रतिक प्रविण सकपाळ या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
रितेश हा कुर्ला येथील म्हाडा, कोहीनूर इमारतीमध्ये राहतो. बुधवारी रात्री तो रिक्षाचे पैसे देऊन घराच्या दिशेने जात होता. यावेळी दत्ता पाटीलने त्याला विनाकारण जोरात धक्का मारुन वाद घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान दत्तासह इतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यात रितेशच्या वडिलांसह भावोजीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या पाचजणांनी त्यांनाही लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर तिक्ष्ण हत्याराने या तिघांवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात रितेशला किरकोळ, त्याच्या वडिलांना छातीला आणि भावोजींना हातावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या तिघांनाही तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाकडून ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी रितेशची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच महेश आणि प्रतिक या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या अटकेनंतर दत्ता पाटीलसह इतर आरोपी पळून गेले होते. या दोघांचा शोध सुरु असताना ते ठाण्यातील घोडबंदर, डोंगरीपाड्यातील जंगलात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर, पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक अमर चेडे, पोलीस हवालदार गांगुर्डे, पोलीस शिपाई सांगळे, परदेशी, महाजन, पाटील, मालगुंडे, विशे, उगले यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दत्ता पाटील आणि मनिष साहू या दोघांना शिताफीने अटक केली. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.