क्षुल्लक वादातून दोन वेगवेगळ्या दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला

हत्येच्या प्रयत्नाच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची पोलिसांकडून नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – क्षुल्लक वादातून दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गोवंडी आणि बोरिवली परिसरात घडली. या हल्ल्यात आसिफ मुस्ताक सय्यद आणि अली अकबर रजा रजानी असे दोन तरुण गंभीररीत्या जखमी झाले असून या दोघांवर बोरिवली आणि गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पहिली घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता बोरिवलीतील एस. व्ही रोड, दौलतनगर, साईनाथ हॉटेलजवळील मुंडे वाईन शॉपसमोर घडली. आसिफ सय्यद हा याच परिसरात राहत असून त्याचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. समीर ऊर्फ चिरा मुकम शेख हा त्याचा परिचित असून पूर्वी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच दरम्यान त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा समीरच्या मनात आसिफविरुद्ध प्रचंड राग होता. याच रागातून शुक्रवारी रात्री तीन वाजता त्याने आसिफवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याच्या मानेवर, पोटावर आणि मांडीवर गंभीर दुखापत झाली होती. जखमी झालेल्या आसिफला नंतर स्थानिक रहिवाशांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आसिफच्या जबानीवरुन पोलिसांनी समीर शेखविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी काही तासांत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसरी घटना गोवंडी येथे घडली. अली अकबर रजा रजानी हा गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. याच परिसरात चारही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, लोटस कॉलनीजवळील शबनम डेअरीजवळ अली रजानी हा उभा होता. यावेळ त्याच्या मावशीचा मुलगा हसन अब्बास सय्यद याचे लहान मुलांसोबत क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. त्यामुळे त्याने त्यांच्यातील भांडण सोडविले होते. या मुलांना शिवीगाळ करुन घरी पाठविले होते. काही वेळानंतर इशान कुरेशी हा त्याच्या तीन सहकार्‍यासोबत तिथे आला आणि त्याने भांडण मिटविताना शिवीगाळ केली म्हणून अलीला जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या इशानसह तिघांनी त्याच्यावर चाकूसह लाकडी बांबूने बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी तिथे उपस्थित स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी त्यांचे दुकान बंद केले, काहीजण घाबरुन तेथून पळून गेले होते. जखमी झालेल्या अलीला त्याच्या कुटुंबियांनी तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अलीच्या तक्रारीवरुन इशान कुरेशी ऊर्फ सोनू तिरपट, रुहान, सोहेल आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page