तीन बांगलादेशी नागरिकांना कारावासासह दंडाची शिक्षा

शिक्षा झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जून 2025
मुंबई, – बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून मुंबई शहरात नोकरीसाठी पळून आलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यात एका पुरुषासह दोन महिलांचा समावेश आहे. शिक्षेनंतर या तिघांनाही त्यांच्या मायदेशात पाठविण्याचे आदेश कोर्टाने कुरार पोलिसांना दिले आहेत.

जानेवारी महिन्यांत मालाडच्या कुरार व्हिलेज आणि टाईम्स ऑफ इंडिया ब्रिजजवळ कुरार पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तिघांच्या चौकशीदरम्यान ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. बांगलादेशातील उपासमारी आणि बेरोजगारीला ते तिघेही कंटाळून गेले होते, त्यामुळे त्यांनी अनधिकृतपणे भारतात प्रवेश मिळविला होता. कोलकाता येथे काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ते तिघेही मुंबई शहरात नोकरीसाठी आले होते. मिळेल ते काम करुन ते स्वतचा उदरनिर्वाह चालवत होते. बांगलादेशातून मुंबई शहरात आल्यानंतर ते काही वर्षांपासून मालाड परिसरात अनधिकृतपणे वास्तव्यास होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर तिन्ही नागरिकांविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते तिघेही कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांच्याविरुद्ध नंतर बोरिवलीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आला होता. या खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी बोरिवली कोर्टाने तिघांनाही दोषी ठरवून साध्या कारावासासह पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा संपल्यांनतर त्यांना त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे. या आरोपींना शिक्षा होण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मेदगे, पोलीस हवालदार शकील शेख, शशिकांत पवार, पोलीस शिपाई विजय कांबळे आणि महिला पोलीस शिपाई श्रेया मिटबावकर यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

दोन महिलांसह तीन बांगलादेशींना अटक
दुसरीकडे वांद्रे येथे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या दोन महिलांसह तीन बांगलादेशी नागरिकांना वांद्रे पोलिसांनी गस्त घालताना शिताफीने अटक केली. जोहरा मुक्तार शेख, नजमा खलिल शेख आणि मोहम्मद अबू जाफर गाजी ऊर्फ जाफर शेख अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांकडून पोलिसांनी तीन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त केले आहेत. तीन दिवसांपूर्वी वांद्रे पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी या पथकाला वांद्रे येथील के. सी मार्गावरील लालमिट्टी, नर्गिस दत्त नगर परिसरात काही बांगलादेशी नागरिकाचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमोडे, सहाय्यक फौजदार देवके, पोलीस हवालदार गायकवाड, अतुल अहिरे, पोलीस शिपाई चौगुले यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून शोधमोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दोन महिलांसह तीन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून या तिघांनी भारतात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्य करुन राहत होते. मिळेल ते काम करत होते. तपासात ही बाब उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page