पोलीस असल्याची बतावणी करुन अपहरणासह 50 लाखांची रॉबरी

पुणे, सातारा व ठाण्यातून पाचही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – भुलेश्वर येथील एका अंगाडियाच्या कर्मचार्‍याचे पोलीस असल्याची बतावणी करुन अपहरण करुन त्याच्याकडील सुमारे 50 लाख रुपयांची कॅश घेऊन पळून गेलेल्या टोळीचा एल. टी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत पाचही आरोपींना पुणे, सातारा आणि ठाण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. अजय बाळकृष्ण लोखंडे, रेवणसिद्ध राजाराम जावळे, सागर दामोदर जाधव, दिलीप काशिनाथ ढेकळे आणि विकास ऊर्फ कृष्णा ऊर्फ मामा अंकुश दबडे अशी या पाचजणांची दनावे असून ते सर्वजण सांगलीचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील कार, सुरा, पोलीस ओळखपत्रासह सुमारे 40 लाखांची कॅश जप्त केली आहे. उर्वरित कॅश लवकरच जप्त केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पाचही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

यातील 37 वर्षांचे तक्रारदार भुलेश्वर येथील पोफळवाडीतील एका अंगाडिया कार्यालयात कामाला आहे. शनिवारी सायंकाळी ते दुसर्‍या कार्यालयातून 50 लाखांची कॅश आणण्यासाठी गेले होते. ही कॅश घेऊन कार्यालयाच्या दिशेने येत असताना पोफळवाडीजवळ तीनजणांनी अडविले. आपण पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांना एका कारजवळ नेले. तिथे अन्य एक तरुण उभा होता. त्यांनी त्याला कारमध्ये बसण्यास सांगितले. मात्र त्याने कारमध्ये बसण्यास नकार दिला. त्यानंतर त्यातील एकाने त्याला सुर्‍याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. या कारमध्ये आधीच एक तरुण चालक म्हणून बसला होता. तक्रारदाराचे अपहरण करुन ही कार भुलेश्वर येथून नवी मुंबईच्या दिशेने जात होती. नवी मुंबईतील खारघर परिसरात येताच त्याच्याकडील 50 लाखांची कॅश असलेली बॅग आणि मोबाईलमधील सिम काढून त्यांनी त्याला खाली उतरविले,

पोलिसांत तक्रार केली तर त्याला बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने पळून गेले होते. यावेळी तक्रारदाराने कारचा क्रमांक नोंद करुन ठेवला होता. घडलेला प्रकार त्याने त्याच्या मालकांना सांगितला. भुलेश्वर येथे आल्यानंतर ते सर्वजण एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात गेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्याने संबंधित पाचजणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन अपहरणासह रॉबरी, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ते तीन पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने भुलेश्वर ते नवी मुंबईतील खारघरदरम्यानचे सुमारे तीनशे ते साडेतीनशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती.

या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पुणे येथे गेलेल्या एका पथकाने अजय लोखंडे आणि रेवंतसिद्ध जावळे या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीनंतर सागर जाधव व दिलीप ढेकळे या दोघांना सातारा तर विकास दबडे याला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत या गुन्ह्यांत या पाचजणांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीची 40 लाखांची कॅश, गुन्ह्यांतील कार, सुरा आणि एक पोलीस ओळखपत्र सापडले आहे. याच ओळखपत्राचा वापर करुन त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली होती. या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, तक्रारदार 50 लाख रुपये घेऊन जाणार आहे याची माहिती त्यांना कोणी दिली याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page