मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मे 2025
मुंबई, – गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या जुन्या वादातून तिघांना स्वतचाच जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना बोरिवलीतील गणपत पाटील नगरात घडली. दोन गटात झालेल्या तुफान राड्यात तिघांचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले. जखमींवर जवळच्या शताब्दी आणि लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये रामनवल गुप्ता, अरविंद रामनवल गुप्ता आणि हमीद नसीरुद्दीन शेख यांचा तर जखमींमध्ये अमर रामनवल गुप्ता, अमीत रामनवल गुप्ता, अरमान हमीद शेख आणि हसन हमीद शेख यांचा समावेश आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे. हसन हमीद शेख असे या आरोपीचे नाव असून त्याला सोमवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. बोरिवलीतील या तिहेरी हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांंगितले.
रामनवल गुप्ता आणि हमीद शेख हे दोघेही बोरिवलीतील गणपत पाटील नरग परिसरात राहतात. याच परिसरात रामनवलचा फळ-नारळ विक्रीचा तर हमीद शेखचा चहाचे एक दुकान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या दोन्ही कुटुंबामध्ये जुना वाद होता. हमीदच्या एका नातेवाईकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या नातेवाईकाच्या मृत्यूस गुप्ता कुटुंबिय जबाबदार असल्याचा आरोप शेख कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गेल्या वर्षी दोघांनी एकमेकांविरुद्ध एमएचबी पोलिसांत क्रॉस तक्रार केली होती. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता रामनवल हा त्याच्या गणपत पाटील नगर येथील नारळ विक्री स्टॉलवर काम करत होता. यावेळी तिथे दारुच्या नशेत हमीद आला होता. यावेळी त्यांच्या जुन्या वादातून शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून त्यांच्यात हाणामारी झाली होती.
हा प्रकार समजताच रामनवलचे तीन मुले अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमीत गुप्ता तर हमीदचे दोन मुले अरमान शेख आणि हसन शेख तिथे आले होते. यावेळी या दोन्ही गटात प्रचंड हाणामारी झाली होती. दोन्ही बाजूने एकमेकांवर लाथ्याबुक्यांनी तसेच तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. त्यात ते सर्वजण जखमी झाले होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती समजताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सर्वांना तातडीने जवळच्या लोटस आणि शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान रामनवल गुप्ता, त्याचा मुलगा अरविंद गुप्ता आणि हमीद शेख या तिघांचा मृत्यू झाला तर इतर चौघांवर तिथे उपचार सुरु आहेत.
तिहेरी हत्येच्या वृत्तानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्यासह इतर पोलीस अधिकार्यांनी धाव घेतली होती. तिहेरी हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती अधिक चिघडू नये म्हणून तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा एमएचबी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. याच गुन्ह्यांत नंतर हसन शेख याला पोलिसांनी अटक केली. इतर जखमींवर उपचार सुरु असून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.