72 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस दोन वर्षांनी अटक

ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाने जोडप्याची फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 डिसेंबर 2025
मुंबई, – फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाने बोरिवलीतील एका जोडप्याची सुमारे 72 लाखांची फसवणुकीनंतर पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस दोन वर्षांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. राजेंद्र भीमराव नेर्लीकर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत देशभुषण बळवंत देशमाने आणि प्रितम देशभुषण देशमाने हे दोघेही सहआरोपी असून ते सर्वजण कोल्हापूरच्या उत्तर आजरा आणि हुपरीचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने मुंबईसह कोल्हापूर शहरात अनेकांची फसवणुक केली असून फसवणुकीचा हा आकडा पाच कोटीपेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे.

मीनल धनपाल सेठ ही महिला बोरिवली येथे राहत तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. 2021 साली ती तिच्या पतीसोबत कर्नाटकच्या हुबली येथील जैन मंदिरात गेली होती. तिथेच त्यांची ओळख जैन मुनी नमित सागरजी महाराज यांच्याशी झाली होती. त्यांनी त्यांना कौटुंबिक जीवनाबाबत अनेकदा चांगले मार्गदर्शन केले होते. त्यामुळे ते नियमित जैन मंदिरात दर्शनासाठी जात होते. तीन वर्षांपूर्वी महाराजांनी त्यांची ओळख देशभूषण व त्यांचा मुलगा प्रितम आणि राजेंद्रशी करुन दिली होती.

ते तिघेही कोल्हापूरचे रहिवाशी असून ते तिघेही महाराजांचे भक्त आहेत. या ओळखीत त्यांनी ते बडे गुंतवणुकदार असून त्यांचा फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसाात अनेकांनी गुंतवणुक केली असून त्यातून त्यांनी त्यांना चांगला परतावा मिळवून दिला आहे असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या शेअरसह फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत टप्याटप्याने त्यांच्याकडे 72 लाख 50 हजाराची गुंतवणुक केली होती.

या गुंतवणुकीनंतर त्यांनी त्यांना 13 लाख 32 हजार रुपये परतावा दिला होता. मात्र नंतर त्यांनी पैसे देणे बंद केले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी मुद्दलसह परताव्याची रक्कम देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यांना पैसे परत केले नाही. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल घेणे बंद केले होते. त्यामुळे मीनल सेठ व तिचे पती धनपाल सेठ हे कोल्हापूरच्या त्यांच्या गावी गेले होते.

यावेळी त्यांना या तिघांनी त्यांच्यासह इतर काही गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून फसवणुक केल्याचे समजले होते. फसवणुकीची ही रक्कम सुमारे पाच कोटीपेक्षा अधिक असल्याचे उघडकीस आले होते. या तिघांकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच मिनल सेठ यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर देशभूषण, त्यांचा मुलगा प्रितम आणि मित्र राजेंद्र यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

मात्र ते तिघेही पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना गेल्या दोन वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या राजेंद्र नेर्लीकर याला शनिवारी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत राजेंद्रने मुंबईसह कोल्हापूर येथे अशाच प्रकारे अनेकांना ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याची कबुली दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page