1 कोटी 65 लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक
तामिळनाडूच्या दोन हिरे व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या 1 कोटी 65 लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी तामिळनाडूच्या दोन हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्षयकुमार आणि हितेशकुमार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही शुभ ऑनामेंटसचे भागीदार आहेत. दोन्ही हिरे व्यापारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
कुणाल पंकज गांधी हे कांदिवलीतील रहिवाशी असून सध्या कांतीलाल छोटालाल डायमंड कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कामाला आहे. या कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये एक कार्यालय आहे. याच कार्यालयातून हिर्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो. अक्षयकुमार आणि हितेशकुमार हे दोघेही तामिळनाडूच्या सावकार पेठचे रहिवाशी असून त्यांची शुभ ऑनामेंटस कंपनीचे भागीदार आहेत. तामिळनाडू येथे त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. एप्रिल महिन्यांचा त्यांच्या परिचित हिरे व्यापारी मनोजभाई हिंमताल आमदावादी यांच्याकडे हितेशकुमारने फोनवरुन काही हिर्यांची मागणी केली होती. त्यांच्याकडे हिरे खरेदीसाठी चांगले ग्राहक असून त्यांना क्रेडिटवर काही हिरे हवे आहेत, हिर्यांचा व्यवहार होताच त्यांना त्यांचे पेमेंट मिळेल असे सांगून त्यासंचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मनोजभाईने कुणाल गांधी यांना फोनवरुन ही माहिती त्यांच्याकडून क्रेडिटवर काही हिर्यांची मागणी केली होती.
मनोजभाई हे त्यांच्या परिचित हिरे व्यापारी होते, त्यांच्यासोबत त्यांच्या कंपनीचा अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यांचा व्यवहार चांगला असल्याने कुणाल गांधी यांनी त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना 1 कोटी 65 लाख रुपयांचे 11 कॅरेटचे हिरे क्रेडिटवर दिले होते. ते हिरे घेण्यासाठी स्वत अक्षयकुमार हा त्यांच्या कार्यालयात आला होता. हिरे घेतल्यानंतर त्याने काही दिवसांत पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्यांचे पेमेंट केले नाही किंवा विक्री न झालेले हिरे परत केले नव्हते. याबाबत कुणाल गांधीसह मनोजभाई यांनी दोन्ही आरोपी व्यापार्यांना संपर्क साधला होता, मात्र ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. दिड महिना उलटूनही या दोघांनी हिर्यांचे पेमेंट न करता हिर्यांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच कुणाल गांधी यांनी बीकेसी पोलिसांत अक्षयकुमार आणि हितेशकुमार यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर या दोन्ही हिरे व्यापार्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांची या दोघांनी परस्पर विक्री करुन पेमेंटचा अपहार केल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांची एक टिम लवकरच तामिळनाडू येथे जाणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.