हिर्‍यांच्या अपहारप्रकरणी व्यापार्‍यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

54 लाख 63 हजार रुपयांचे हिरे घेऊन दोघेही पळून गेले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे 54 लाख रुपयांच्या हिर्‍यांच्या अपहारप्रकरणी एका हिरे व्यापार्‍यासह दोघांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. सिद्धार्थ यशवंतराय रवासा आणि जयनीश प्रकाशभाई डहायानी अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही हिरे घेऊन पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर हिरे व्यापार्‍याकडून हिरे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

कुर्ला येथील रहिवाशी असलेले मनोजभाई हिम्मतभाई अमदावादी हे हिरे व्यापारी असून त्यांची श्रीराम रामदूत जेम्स नावाची एक हिरे खरेदी-विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहे. मुंबईसह सुरत येथेही कंपनीचे कार्यालय आहे. या दोन्ही कार्यालयातून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालते. अनेकदा ते दलालामार्फत हिर्‍यांची विक्री करतात. जयनीश हा हिरे व्यापारी असून तो त्यांच्या परिचित आहेत. त्याच्यासोबत त्यांनी अनेकदा हिर्‍यांचा व्यवहार केला होता. मागणीनुसार हिर्‍यांची मागणी केल्यानंतर त्याने वेळेवर पेमेंट केले होते. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता.

27 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत जयनीशने त्यांच्याकडून 39 लाख 53 हजार 355 हिरे विक्रीसाठी घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्‍यांचे पेमेंट केले नाही किंवा हिरे परत केले नव्हते. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी जयनीशविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. अशाच दुसर्‍या घटनेत सव्वातेरा लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धनश्याम चतुरभाई कालरिया हे हिरे व्यापारी असून त्यांची वांद्रे येथील भारत डायमंड बोर्समध्ये जे. ए एक्पेक्स नावाची कंपनी आहे.

याच कंपनीसाठी तो हिर्‍यांच्या खरेदी-विक्रीच्या दलालीचेकाम करत होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्याने त्यांना त्याच्याकडे चांगले ग्राहक असून त्यांना हिर्‍यांची गरज असल्याचे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सिद्धार्थला सव्वातेरा लाखांचे हिरे दिले होते. हा व्यवहार पूर्ण होताच पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत पेमेंट न करता तो पळून गेला होता. त्यामुळे धनश्याम कालरिया यांनी सिद्धार्थविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती.

या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी सिद्धार्थ रवासा आणि जयनीश डहायानी या दोघांविरुद्ध हिर्‍यांचा अपहार करुन दोन हिरे व्यापार्‍यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. फसवणुकीनंतर ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page