मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – काळबादेवी परिसरातील एका बांधकाम साईटवरील सुरवायझरला खंडणीसाठी धमकावून बेदम मारहाण केल्याप्रकरणी चारजणांच्या एका टोळीला एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. रोहित राजकुमार गुप्ता, जयेश विनोदकुमार वालंत्रा, दशरथ रामवकवाल पांडे आणि आदित्य संपत नायडू अशी या चौघांची नावे आहेत. पोलीस कोठडीनंतर शनिवारी या चारही आरोपींची किल्ला कोर्टाने दहा हजाराच्या जामिनपावर सुटका केली आहे. यातील रोहित गुप्ता या टोळीचा म्होरक्या असून तो स्वतला कुलाबा विधानसभेचा शिवसेनेचा उपविभागप्रमुख असल्याचे सांगतो.
निसार अब्दुल सत्तार कुरेशी हे मूळचे राजस्थानच्या चुरु, राजगडचे रहिवाशी असून तिथेच त्यांची पत्नी, मुले व इतर कुटुंबिय राहतात. कामानिमित्त ते मुंबईत राहत असून सध्या जोगेश्वरीतील एस. व्ही रोड, राजनगर सोसायटीमध्ये राहतात. मुंबई शहरात विविध ठिकाणी बांधकाम साईट सुरु असून याच ठिकाणी ते सुपरवायझर म्हणून काम करतात. सध्या त्यांची नेमणूक काळबादेवी येथील दिगंबर जैन मंदिरसमोरील इमारत क्रमांक 205 व 207 येथे आहे. 19 मेला रात्री साडेनऊ वाजता ते त्यांच्या सहकार्यासोबत तिथे काम करत होते. यावेळी तिथे काही तरुण आले. त्यांनी ते शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून शिवसेना या पक्षाचे कुलाबा विधानसभा उपविभागप्रमुख रोहित गुप्ता यांचे कार्ड दिले. आपण रोहित गुप्ताचे सहकारी तसेच माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. तिथे बांधकाम करायचे असेल तर रोहित गुप्ता यांना दरमाह यांना खंडणीची रक्कम द्यावी लागेल.
खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांना तिथे काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती. यावेळी निसार कुरेशी यांनी त्यांच्याकडे पैसे नसून कॉन्ट्रक्टर आसिफभाईंना तुमचा मॅसेज देतो. त्यांच्याकडे हा अधिकार आहे असे सांगितले. त्याचा राग आल्याने या तरुणांनी त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. यावेळी तिथे उपस्थित कामगारांनी त्यांच्यात मध्यस्थी करुन निसार कुरेशी यांना बाजूला केले. त्यानंतर ते दोघेही खंडणीची रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन तेथून निघून गेले. घडलेला प्रकार आसिफभाई यांना समजताच ते तिथे आले होते. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून संबंधित तरुणांविरुद्ध खंडणीसाठी धमकी देऊन शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याप्रकरणी तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या दशरथ पांडे, रोहित गुप्ता, जयेश वालंत्रा आणि आदित्य नायडू या चौघांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. चौकशीत त्यांनीच तक्रारदार निसार कुरेशी यांना खंडणीसाठी धमकावून मारहाण केल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर चारही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवार 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शनिवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी देताना कोर्टाने त्यांची दहा हजाराच्या जामिनावर सुटका केली.