पावणेबारा कोटीच्या हिर्यांसह दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
पळून गेलेल्या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जून 2025
मुंबई, – क्रेडिटवर विक्रीसाठी घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हिर्यांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिरजू किशोरकुमार सल्ला या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर 5947 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, 18965 ग्रॅम वजनाचे चांदीचे भांडी आणि 172 कॅरेटचे हिरे असा 12 कोटी 77 लाख 99 हजार 680 रुपयांचा मुद्देमालाचा अपहार केल्याचा आरोप असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शैलेश कांतीलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या कुटुंबियांसोबत मरिनड्राईव्ह परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथील शेख मेमन रोड, गिरीराज इमारतीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांचे दोन बंधू संजय जैन आणि जितेंद्र जैन हे पार्टनर आहेत. बिरजू सल्ला हा ज्वेलर्स व्यापारी असून तो ताडदेव परिसरात राहतो. एकाच व्यवसायात असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. बिरजूचे वडिल किशोरकुमार यांचा त्यांच्याच गिरीराज इमारतीमध्ये क्रिश ज्वेलर्स नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगले व्यावसायिक संबंध असून ते एकमेकांना अनेकदा क्रेडिटवर विक्रीसाठी सोन्या-चांदीचे दागिने देत होते.
त्यांचा भाऊ संजय जैन आणि बिरजू सल्ला हे पूर्वीपासून चांगले मित्र आहेत. त्यामुळे बिरजू हा नेहमीच त्यांच्या शॉपमध्य ये होता. 18 नोव्हेंबर 2024 रोजी बिरजू हा त्यांच्या शॉपमध्ये आला होता. त्याने त्यांना त्याच्याकडे चांगले ग्राहक असून त्यांना अॅण्टींग दागिन्यांची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी बिरजूला 7 किलो 214 ग्रॅम वजनाचे विविध नेकलेस, टॉप्स, बांगड्या, नोजपीस, गळ्यातील माळ, मांगटिका, अंगठ्या, 224 कॅरेटचे हिरे आणि 32 किलो 915 ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या चांदीच्या भांडी असा सुमारे चौदा कोटीचा मुद्देमाल दिला होता. काही दिवसांत व्यवहार पूर्ण करुन पेमेंट देण्याचे तसेच विक्री न झालेले दागिने परत आणून देण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्याने 1 कोटी 48 लाख रुपयांचे दागिने त्यांना परत केले.
या दागिन्यांची विक्री झाली नाही असे त्याने त्यांना सांगून उर्वरित दागिन्यांचे लवकरच पेमेंट करतो असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पेमेंट केले नाही. प्रत्येक वेळेस तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्यचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्याचे तिन्ही मोबाईल बंद केले होते. घडलेला प्रकार त्यांनी बिरजूचे वडिल किशोरकुमार सल्ला यांना सांगितला. यावेळी त्यांनी बिरजू हा घर सोडून निघून गेल्याचे सांगितले. याबाबत त्याच्या वडिलांनी त्याची गावदेवी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार केली होती.
चौकशीदरम्यान त्यांना बिरजू हा अहमदाबाद विमान अपहरण प्रकरणात जेलमध्ये होता. त्यामुळे त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून बिरजू सल्लाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी बिरजूने 5947 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, 18965 ग्रॅम वजनाचे चांदीचे भांडी आणि 172 कॅरेटचे हिरे असा 12 कोटी 77 लाख 99 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल अपहार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राथमिक तपासात बिरजू सल्ला हा मुंबई सोडून पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एल. टी मार्ग पोलिसांचे काही टिम लवकरच मुंबईबाहेर जाणार आहे.