दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पतीची गळा आवळून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला दोन तासांत अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून रागाच्या गौसिया वसीम शेख या 25 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पती वसीम रफिक शेख याला अवघ्या दोन तासांत बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही घटना सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता गोरेगाव येथील लिंक रोड, शहिद भगतसिंग नगर क्रमांक दोन, इलेक्ट्रीक टॉवरजवळ घडली. याच परसिरात गौशिया ही महिला तिचा आरोपी पती वसीम शेख आणि मुलांसोबत राहत होती. वसीमला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे तो तिच्याकडे सतत दारुसाठी पैशांची मागणी करत होता. तिने नकार दिल्यास तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात त्याने गौसिया हिची तिच्या मुलासमोरच गळा आवळून हत्या केली होती. हत्येनंतर तो पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गौसियाला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी गौसियाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी वसीमविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मिना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अमीत शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, संजय सरोळकर, रंधे, बनकर, मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक पियुष टारे, राठोड, मंगेश केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक करपे, पोलीस हवालदार राठोड व अन्य पोलीस पथकाने आरोपी पतीचा शोध सुरु केला होता. तपासात तो सतत त्याचे लोकेशन बदलत होता.
रेल्वेमार्गे तो मुंबईबाहेर पळून जाण्याचा तयारीत असल्याची माहिती प्राप्त होताच या पथकाने प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम वसीमला राम मंदिर रेल्वे स्थानकातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच त्याच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर तो मुंबईबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.