मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन रिना राजेंद्र वर्मा या महिलेची तिच्याच पतीने हत्या करुन अहमदाबाद येथून मुंबईत पलायन केले. याप्रकरणी नारोल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अनिल ऊर्फ बोबी जंगम या आरोपी पतीला घाटकोपर येथून पंतनगर पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या काही तासांत अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नारोल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याला पुढील चौकशीसाठी अहमदाबाद येथे नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनिल आणि रिना हे दोघेही पती-पत्नी असून घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर, साठेनगरचे रहिवाशी आहेत. 2017 साली ते नोकरीनिमित्त अहमदाबादला गेले होते. सध्या ते दोघेही नारोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून अनिल हा रिनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याच कारणावरुन या दोघांमध्ये सतत खटके उडत होते. मंगळवारी सकाळी दहा वाजता या दोघांमध्ये प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. या वादातून अनिलने रिनाची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर तो प्रचंड घाबरला आणि अहमदाबाद येथून मुंबईत पळून आला होता.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच नारोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रिनाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेनंतर अनिलविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन तो मुंबईच्या घाटकोपर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर नारोल पोलिसांनी ही माहिती पंतनगर पोलिसांना सांगून आरोपी पतीच्या अटकेसाठी विनंती केली होती.
ही माहिती प्राप्त होताच पंतनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने पत्नीच्या हत्येनंतर अहमदाबाद येथून मुंबईत पळून आलेल्या अनिल जंगमला घाटकोपर येथून काही तासांत अटक केली. त्याच्या अटकेची माहिती नंतर नारोल पोलिसांना देण्यात आली होती. मुंबईत आलेल्या या पथकाने नंतर अनिलचा ताबा घेतला होता. त्याला पुढील चौकशीसाठी अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे.