व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने बाराजणांची फसवणुक

30 लाखांना गंडा घालणार्‍या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑगस्ट 2025
मुंबई, – होलसेल चांदी खरेदी-विक्री व्यवसायात चांगला प्रॉफिट असल्याची बतावणी करुन एका व्यापार्‍यासह त्यांच्या मित्रांना तसेच परिचितांना व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन पाचजणांच्या टोळीने सुमारे तीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यापार्‍याच्या पत्नीच्या चार चुलत भावासह पाचजणांविरुद्ध कुर्ला पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये निर्मल सोहनलाल मलविया, राजेश सोहनलाल मलविया, मनोज सोहनलाल मलविया, हरिश किशनलाल सुतार आणि योगेश चंपालाल मालविया यांचा समावेश आहे. पाचही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हरिश बेराराम लोहार हे कुर्ला येथे राहत असून त्यांचा स्वतचा किराणा मालाचे एक दुकान आहे. मालविया हे त्यांच्या पत्नीचे चुलत बंधू आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांची चारही आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांत ते एकमेकांना भेटत होते. या भेटीदरम्यान त्यांनी त्यांना त्यांचा होलसेल चांदीचा व्यवसाय आहे. ते स्वस्तात चांदी घेऊन त्याची इतर व्यापार्‍यांना होलसेलमध्ये विक्री करतात. या व्यवसायात त्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनीही चांदीच्या व्यवसायात गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना पंधरा टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे आधी पन्नास हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनी त्यांना मूळ रक्कमेसह साडेसात हजार परतावा म्हणून दिले होते.

वर्षभरात त्यांनी मालवियासह हरिश सुतारकडे साडेसहा लाखांची गुंतवणुक केल्यानंतर त्यांनी त्यांना सुमारे चार लाख रुपये परतावा म्हणून परत केले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे परिचित आणि मित्र सुनिल अंबिका गुप्ता, विक्रांत शिवाजी मोरडे, राहुल कमलेश गुप्ता, नरेंद्र किसन शिंदे, वैभव हिरजी खंभल्याख दिपक शंकर गांगुर्डे, अर्जुन विजय सिंग, प्रविण वक्ताराम चौधरी, भेराराम चौगजी ोहार, मुकेश नंदू अशा अकराजणांनी त्यांच्याकडे टप्याटप्याने 43 लाख 51 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनी त्यांना 13 लाख 69 हजार रुपये परत केले,

मात्र उर्वरित तीस लाख रुपये कुठल्याही परताव्यासह परत न करता संबंधित बाराजणांची फसवणुक केली होती. आरोपी गुजरात आणि राजस्थान येथे राहत असल्याने तक्रारदार त्यांच्या मूळ गावी गेले होते, यावेळी त्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित पाचही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी निर्मल, राजेश, मनोज आणि योगेश मालविया, हरिश सुतार या पाचांविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page