40 वर्षांच्या महिलेच्या हत्येप्रकरणी तिन्ही मारेकर्‍यांना अटक

ठाण्यातील कळवा-गुन्हे शाखेची बिहारमध्ये विशेष कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
ठाणे, – कळवा येथे एका 40 वर्षांच्या महिलेची हत्या करुन मुंबईहून बिहारला पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना ठाण्यातील कळवा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अवघ्या 72 तासांत अटक केली. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर दोघांनाही लोकल कोर्टाने मंगळवार 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी शांताबाई सुरेश चव्हाण या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली.

ही घटना 14 जूनला दुपारी पावणेचार वाजता कळवा येथील कावेरी सेतू रोड, नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर उघडकीस आली होती. या ठिकाणी एक महिला बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. या महिलेला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तपासात मृत महिलेचे नाव शांताबाई चव्हाण असल्याचे तसेच ती कळवा येथील सम्राटनगर परिसरात राहत होती. ती बिगारी कामगार म्हणून काम करत होती. तिच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर तिचा पती सुरेश चव्हाण याच्या तक्रारीवरुन कळवा पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तीन विशेष टिम तयार करुन स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने संमातर तपास सुरु केला होता. परिसरातील सुमारे शंभरहून अधिक सीसीटिव्ही फुटेज पाहणी करुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिकासह इतर लोकांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतून तीन संशयितांची नावे समोर आले होते. गुन्हा घडल्यानंतर ते तिघेही परराज्यात पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. हाच धागा पकडून एका पथकाला बिहारला पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिनसांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच शांताबाई हिची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या तिघांना पुढील चौकशीसाठी ठाण्यात आणण्यात आले. अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात तर इतर दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही कोर्टाने 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 72 तासांत तिन्ही आरोपींना पोलिसांनी बिहार येथून शिताफीने अटक करुन या हत्येचा पर्दाफाश केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल गायकवाड, विठ्ठल नावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाळे, धोंडे, गुन्हे शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतो पिंपळे, विकास सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, दिपक घुगे, सुरेश माळोदे, पोलीस हवालदार संदीप महाडिक, प्रमोद ईशी, निखील जाधव, राहुल पवार, दादा पाटील घुगे,पोलीस नाईक चंद्रीान शिंदे, दिनकर सावंत, पोलीस शिपाई रोहन म्हात्रे, महादेव हजारे, विकास चेमटे, नामदेव कोळी, तांत्रिक माहिती मदतनीस पोलीस हवालदार समाधान माळी, दादासाहेब पाटील, पोलीस शिपाई सागर सुरळकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page