साडेचार वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश
24 तासांत मुख्य आरोपीस अटक करुन मुलीची सुखरुप सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
बदलापूर, – साडेचार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा बदलापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत मुख्य आरोपीस अटक करुन त्याच्या तावडीतून पोलिसांनी बळीत मुलीची सुखरुप सुटका केली. रंजीत बिसनलाल धुर्वे असे या 26 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. बळीत मुलीच्या पालकांसोबत झालेल्या क्षुल्लक वादातून त्याने रागाच्या भरात अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार हे बदलापूर येथे राहत असून त्यांना साडेचार वर्षांची मुलगी आहे. 24 जूनला त्यांच्या मुलीचे रंजीत धुर्वे याने अपहरण केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बदलापूर पोलिसांत रंजीतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, संजय जाधव, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे, अशोक पवार, पोलीस हवालीदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, चंद्रकांत पाटील, मंगेश जाधव, चंद्रकांत सावंत, सुरेश जाधव, पोलीस शिपाई रामदास उगले यांच्यासह पोलीस निरीक्षक संदीप ओंबासे, आरपीएस, एसआयडी सोलापूर विभाग, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर आरपीएफ अंबरनाथ विभाग आदींनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
परिसरासह रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन रंजीत हा बदलापूर येथून मध्यप्रदेशला पळून जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रंजीतला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या तावडीतून पोलिसांनी बळीत साडेचार वर्षांच्या मुलीची सुखरुप सुटका केली. त्याला नंतर स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यातआले.
चौकशीत रंजीत हा मूळचा मध्यप्रदेशच्या छिदवादा, उमरेठ, मोरडोंगरी गावचा रहिवाशी आहे. रंजीत हा सध्या बदलापूर, रामटेकडी येथे राहत असून एका कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरीचे काम करत होता. त्याच्याच शेजारी तक्रारदार कुटुंबिय राहत होते. 23 जूनला रंजितसोबत तक्रारदाराचा वाद झाला होता. या वादातून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून रागाच्या भरात त्याने तक्रारदाराच्या मुलीचे अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.