मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपींना कारावास

112 कलमांतर्गत आरोपींना झालेली पहिलीच शिक्षा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मे 2025
मुंबई, – गणपती विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या पाच आरोपींना गिरगाव येथील लोकल कोर्टाने दोषी ठरवून विविध कलमांतर्गत एक वर्षांच्या कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावणी आहे. संजय रमन खारवा, संजय सुरेश खारवा, सुमेश राजेंद्र लोहकरे, लालतू तुनू डे आणि आकाश विजय मेहरा अशी या पाचजणांची नावे आहेत. पाचही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. नव्याने लागू झालेल्या 112 कलमांतर्गत आरोपींना झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

20 सप्टेंबर 2024 रोजी बासेर सादेक शेख हे गिरगाव परिसरात गणपती विसर्जनासाठी आले होते. यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान त्यांचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. हा प्रकार नंतर उघडकीस येताच त्यांनी व्ही. पी रोड पोलिसांत मोबाईल चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान गणेश विसर्जनादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन काही चोरट्यांनी अनेक गणेशभक्तांचे मोबाईल, वॉलेट चोरी केल्याचे उघडकीस आले होते, याबाबत काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गर्दीचा फायदा घेऊन चोर्‍या करणार्‍या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत पाच सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली होती.

चौकशीत त्यांची नावे संजय खारवा, सुमेश लोहकरे, संजय खारवा, लालतू डे आणि आकाश मेहता असल्याचे उघडकीस आले होते. या आरोपींकडून पोलिसांनी विविध कंपनीचे आणि मॉडेलचे एकूण 42 चोरीचे मोबाईल आणि एक बाईक जप्त केले होते. पाचही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांच्याविरुद्ध 1 जुलै 2024 मध्ये लागू केलेल्या भारतीय न्याय सहिता 2023 मधील कलम 112 किरकोळ संघटित गुन्हेगारी या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या नव्या कलमांतर्गत त्यांच्याविरुद्ध गिरगाव येथील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.

या खटल्याची नियमित सुनावणी कोर्टात सुरु होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. शुक्रवारी 16 मेला कोर्टाने पाचही आरोपींना 303 (2) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजाराचा दंड, 317 (2) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास तसेच 112 अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावणी आहे. आरोपींना 112 कलमांतर्गत झालेली ही पहिलीच शिक्षा आहे.

या गुन्ह्यांचा तपास अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहीतकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्यामराव वाटसर, पोलीस हवालदार शैलेश कदम, मुन्ना सिंग, उमेश शिरवडकर, राजेश चौधरी, देवीदास जाधव, पोलीस शिपाई मोशिन शेख, प्रसाद शिंदे, बाजीराव संदे, किशोर कोकणी, प्रतिक शिर्के यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page