रेल्वे पोलीस दलातील महिलेकडे वीस लाखांची खंडणीची मागणी

शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरलची दिली होती धमकी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – रेल्वे पोलीस दलात कामाला असलेल्या महिला कर्मचार्‍याकडे तिच्याच पतीसह त्याची पत्नी, आई आणि मित्रांनी वीस लाखांची खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शारीरिक संबंधाचे अश्लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या चौघांनी तिला ब्लॅकमेल करुन धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अतुल सत्यनारायण वर्मा, आराधना अतुल वर्मा, अमर सिंग आणि मालदेवी सत्यनारायण वर्मा अशी या चौघांची नावे आहेत. यातील अतुल हा मुख्य आरोपी असून आराधना त्याची पत्नी तर मालदेवी ही आई आहे. ते सर्वजण कुर्ला येथील नेहरुनगर परिसरातील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

25 वर्षांची तक्रारदार तरुणी ही मूळची मध्यप्रदेशच्या नर्मदापूरची रहिवाशी असून सध्य नाशिकच्या इगतपुरी परिसरात राहते. ती रेल्वे पोलीस दलात कामाला आहे. जानेवारी 2021 रोजी तिची ओळख अतुल वर्माशी झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध आले होते. अनेकदा ते दोघही मुलुंड आणि लोणावळा येथील हॉटेलमध्ये भेटत होते. तिथेच त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिच्याशी लग्नही केले होते. शारीरिक संबंधादरम्यान त्याने तिचे काही अश्लील फोटोसह व्हिडीओ बनविले होते. ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत अतुलने तिला ब्लॅकमेल सुरु केले होते.

इतकेच नव्हे तर त्याची पत्नी आराधना आणि मित्र अमन सिंग यांनीही तिला दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. त्याची आई मालदेवी हिने तिला फोनवरुन अश्लील शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर तिला अतुल हा विवाहीत असून तो त्याच्या पत्नी आणि आईसोबत कुर्ला येथे राहत असल्याचे समजले होते. गेल्या काही महिन्यांपासून अतुलसह त्याच्या पत्नी व मित्रांनी तिच्याकडे प्रत्येकी दहा लाख असे वीस लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याी धमकी दिली होती. या प्रकारामुळे ती प्रचंड मानसिक नैराश्यात होती.

अतुलकडून झालेल्या विश्वासघातमुळे तिच्या कामावर प्रचंड परिणाम झाला होता. अलीकडेच तिने हा प्रकार तिच्या परिचित मित्रांना सांगितला होता. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने नेहरुनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अतुलसह इतर तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अतुल वर्मा, त्याची पत्नी आराधना, आई मालदेवी आणि मित्र अमर सिंग या चौघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत चारही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page