मैदानात झोपण्यावरुन 36 वर्षांच्या व्यक्तीची हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलासह सातजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
पालघर, – मैदानात झोपण्यावरुन अभिषेक राम सिंग या 36 वर्षांच्या व्यक्तीची लाथ्याबुक्यासह तिक्ष्ण हत्याराने झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात तारापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह सातही मारेकर्यांना बिहार, सुरत आणि वसई येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्यात भूषण सुरेश धोडी, केतनरमेश शिणवार, रोहित संजय कवळे, दिवेश संतोष सुतार, विशाल नंदू सोमण, साहिल राजेंद्र पवार आणि एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर सहा आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राम कालिका सिंग हे 60 वर्षांचे वयोवृद्ध मूळचे उत्तरप्रदेशच्या जोनपूर, कोतवालपूरचे रहिवाशी आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत पालघर येथील पास्थळ, जिजाऊनगर, रिमझिम अपार्टमेंटमध्ये राहतात. अभिषेक हा त्यांचा मुलगा आहे. 15 मेला रात्री आठ ते 16 मे सकाळी सव्वासातच्या दरमयन आंबटगोड मैदान, मौजे पास्थळ परिसरात अभिषेकची काही अज्ञात व्यक्तींनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तारापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राम सिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तारापूर पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, निवास कणसे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत-देसाई, रोहित खोत, गोरखनाथ राठोड, पोलीस हवालदार दिपक राऊत, संदीप सरदार, राकेश पाटील, नरेंद्र पाटील, दिनेश गायकवाड, विजय ठाकूर, कपिल नेमाडे, भगवान आव्हाड, पोलीस नाईक कल्याण केंगार, पोलीस अंमलदार प्रशांत निकम, वैभव जामदार यांनी गुजरातच्या सुरत, वसई-विरार, बिहारच्या पटना व दरभंगा या वेगवेगळ्या परिसरातून एका अल्पवयीन मुलासह सातजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या सर्वांनी संगनमत करुन अभिषेक सिंग यांची हत्या केल्याची कबुली दिली होती. 15 मेला ते सर्वजण अल्पवयीन आरोपीच्या घरी पार्टीसाठी एकत्र जमा झाले होते. पार्टीनंतर ते सर्वजण बाईकवरुन फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी अभिषेक हा आंबटगोड मैदानता झोपल्याचे त्यांना दिसून आला. तो तिथे का झोपला आहे या क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून या सातजणांनी त्याला शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने मारहाण केली होती. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने अभिषेकचा जागीच मृत्यू झाला होता. या हत्येनंतर ते सर्वजण पळून गेले होते. या गुन्ह्यांचा कुठलाही पुरावा नसताना या पथकाने एका आठवड्यात हत्येच्या गुन्ह्यांतील सर्व आरोपींना शिताफीने अटक केली. झोपण्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.