स्वस्तात सोने देतो सांगून फसवणुक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

दोन महिलांसह चौघांना बोगस सोन्याच्या दागिन्यांसह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – स्वस्तात सोने देतो असे सांगून एका सीएची फसवणुक करणार्‍या चारजणांच्या टोळीला टिळकनगर पोलिसांनी हनी ट्रप लावून शिताफीने अटक केली. तौफिक अहमद हबीबुल्ला खान, विवेकानंद विनायक बापट, तब्बसुम इरफान अहमद शेख आणि आश्विनी बापू कांबळे अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक गुन्हे केल्याचे बोलले जात असून त्यांच्या अटकेने फसवणुकीच्या अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धिरज कमल जैन हे दहिसर येथे राहत असून ते सीए म्हणून काम करतात. जानेवारी महिन्यांत त्यासंची विवेकानंदशी ओळख झाली होती. तो ठाण्यातील वर्तकनगर परिसरात राहत असून व्यवसायाने व्यापारी आहे. त्याने त्यांना स्वस्तात सोने देण्यासह प्रॉपटीमध्ये गुंतवणुकीबाबत सांगितले होते. दोन महिन्यांपूर्वी त्याने त्यांची तब्बसुम नावाच्या एका महिलेशी ओळख करुन दिली होती. तिला पैशांची गरज आहे. तिच्याकडे असलेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांना साडेचार लाखांची व्यवस्था करण्यास सांगितले होते.

गेल्या काही दिवसांत सोने प्रचंड महागात झाले होते, त्यामुळे त्यांनी तब्बसुमकडून स्वस्तात सोने घेण्याचा निर्णय घेतला होता. ते सोने तिने एका बँकेत तारण म्हणून ठेवले होते, बँकेतून सोने सोडविल्याची पावती दाखवून तिने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी तिला साडेचार लाख रुपये रोख स्वरुपात देऊन तिच्याकडून 85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले होते. हा संपूर्ण व्यवहार 21 मेला साकिनाका मेट्रो स्थानकाजवळ झाला होता. तब्बसुमकडून घेतलेल्या दागिन्यांबाबत शंका निर्माण झाल्याने त्यांनी गोरेगाव येथे दागिन्यांची शहानिशा केली होती. त्यात ते सोने बोगस असल्याचे उघडकीस आले होते. या टोळीने स्वस्तात सोने देतो असे सांगून त्यांची फसवणुक केली होती.

चौकशीदरम्यान या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार टिळकनगर पोलिसांना सांगून विवेकानंद बापटशी पुन्हा संपर्क साधला होता. त्याच्याकडे आणखीन सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. ते दागिने घेऊन त्यांनी त्याला चेंबूर येथे बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी विवेकानंद विवेकानंद हा त्याच्या तीन सहकार्‍यासोबत तिथे आला होता. यावेळी तिथे साध्या वेशात पाळत ठेवलेल्या पोलिसांनी तौफिक खान, विवेकानंद बापट, तब्बसुम शेख आणि आश्विनी कांबळे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी काही दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची ज्वेलर्स व्यापार्‍याकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी या ज्वेलर्स व्यापार्‍याने ते सर्व दागिने बोगस असल्याचे सांगितले होते.

या घटनेनंतर धीरज जैन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांची पोलिसाकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page