मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – आपल्यावर काही लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याची पिडीत तरुणीने दिलेली साक्ष खोटी असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. मात्र तिने दिलेल्या तक्रारीवरुन वनराई पोलिसांनी एका रिक्षाचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या माहितीचीही पोलिसांकडून शहानिशा करण्यात येत आहेत. पालकांच्या भीतीपोटी पिडीत तरुणीने पोलिसांना खोटी साक्ष दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान तरुणीवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२० वर्षांची ही पिडीत तरुणी तिच्या आई-वडिलांसह भावडांसोबत नालासोपारा परिसरात राहते. तिचे वडिल रागीट स्वभावाचे आहेत. क्षुल्लक कारणावरुन ते तिच्याशी वाद घालून तिला दम देत होते. त्याला ती कंटाळून गेली होती. त्यातून ती दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती. नालासोपारा येथे आल्यानंतर ती एका बाजूला शांतपणे बसली होती. यावेळी तिच्याकडे एक रिक्षाचालक आला आणि त्याने तिची आपुलकीने चौकशी केली होती. यावेळी तिने रिक्षाचालकाला आत्महत्या करायची आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने तिची समजूत काढून तिला त्याच्या रिक्षातून नेले. अर्नाळा येथे आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तो तिला नालासोपारा येथे सोडून पळून गेला होता. दिवसभर मुलगी घराबाहेर होती, त्यामुळे आता आपली खैर नाही. वडिलांकडून चांगलाच समाचार होणार या भीतीने ती घरी गेलीच नाही. गोरेगाव येथील राममंदिर रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिची एका व्यक्तीने चौकशी केली होती. यावेळी तिने तिच्यावर काही लोकांनी सामूहिक बलात्कार केला होता. तिच्या गुप्त भागावर गंभीर दुखापत झाली होती. तिच्याकडे पाहून ती सांगत असलेली माहिती खरी समजून तसेच तिच्या गुप्त भागातून रक्त येत असल्याने त्याने ही माहिती पोलिसांना दिली.
या माहितीनंतर वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये ाखल केले. तिची प्रकृती ठिक नसल्याने तिला नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच डॉक्टरांनी तिच्या शरीरातून सिझेरियनचे ब्लेड आणि दगडाचे तुकडे बाहेर काढले होते. या घटनेनंतर तिची पोलिसांनी जबानी नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ती पोलिसांना सतत विसंगत माहिती देत होती. सुरुवातीला तिने ती बनारसची रहिवाशी असून तिला गेल्याच आठवड्यात तिचे काका बनारस येथून मुंबईत आणले होते. वांद्रे टर्मिनस येथून ते काकाच्या नालासोपारा येथील घरी गेले होते. त्यानंतर तिच्यावर काही लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. या माहितीनंतर पोलिसांन गेल्या आठवड्याभरातील सर्व सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती.
मात्र वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात ती कुठेच दिसून आली नाही. त्यानंतर तिची पोलिसांनी पुन्हा चौकशी केली असता तिच्यावर काही लोकांनी बलात्कार केल्याचे सांगितले. मात्र तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचेही काही पुरावे पोलिसांना सापडले नाही. ती सतत तिची साक्ष बदलत होती, खोटी साक्ष देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिला दमात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पालकांच्या भीतीपोटीने तिने खोटी साक्ष दिल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिला अर्नाळा घेऊन गेलेल्या अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या रिक्षाचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार केला आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.