मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 जून 2025
मुंबई, – मित्राकडे जातो असे सांगून सुमारे सतरा लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन एका कामगाराने पलायन केल्याची घटना मशिदबंदर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जयंता मंडल या 34 वर्षांच्या आरोपी कामगाराविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी पायधुनी पोलिसांची एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विकास हराधन घोष हे मशिदबंदरचे रहिवाशी असून त्यांचा दागिने बनविण्याचा कारखाना आहे. मशिदबंदर परिसरात असलेल्या या कारखान्यात इतर कामगारासोबत जयंता मंडल हा कामाला होता. 10 मे 2025 रोजी जयंता हा नेहमीप्रमाणे कामावर हजर झाला होता. काही वेळानंतर तो मित्राकडे जातो असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा कामावर आला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कारखान्यातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. यावेळी जयंता हा टेबलावर बसून काम करत होता.
काही वेळानंतर त्याने ड्राव्हरमधील काही दागिने काढले. ते दागिने घेतल्यानंतर तो मित्रांकडे जातो असे सांगून गेला होता. त्यामुळे त्यांनी ड्राव्हरमधील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात त्यांना सतरा लाख रुपयांचे 22 कॅरेटचे दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गहाळ असल्याचे दिसून आले. या दागिन्यांची जयंतानेच चोरी करुन पलायन केले होते. त्यामुळे विकास घोष हे त्याच्या गावी गेले होते. यावेळी त्यांना त्यांचे आई-वडिल भेटले. त्यांनी त्यांच्याकडे जयंताबाबत चौकशी केली असता तो गावी आल्याचे समजले. त्यांनी त्याचा त्याच्या गावासह इतर गावात शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे ते मुंबईत परत आले होते.
कारखान्यांतील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर ते पायधुनी पोलीस ठाण्यात आले. ते फुटेज पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी जयंताविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. जयंता हा कोलकाता येथील परगणा, साऊथच्या शंभुनगरचा रहिवाशी आहेत. तो त्याच्या गावी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पायधुनी पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.