बोगस नोकरीचे पत्र देऊन सहा बेरोजगार तरुणांची फसवणुक

पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जून २०२६
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर नोकरीचे आमिष दाखवून सहा बेरोजगार तरुणांची सुमारे सव्वासात लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस पाच महिन्यानंतर विमानतळ पोलिसांनी अटक केली. विलास सुधाकर ठाकरे असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. विलासने नोकरीच्या आमिषाने आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

रेहान इरफान काझी हा २५ वर्षांचा तरुण गोवंडीतील शिवाजीनगर, म्हाडा कॉलनीत राहतो. फेब्रुवारी २०२४ रोजी त्याची विलास ठाकरेशी ओळख झाली होती. तो डोबिवलीत राहत असून त्याने रेहानला आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीचे आमिष दाखविले होते. यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी रेहान हा विलेपार्ले येथील सेरोमोनियल लॉजसमोरील पास सेक्शन कार्यालयाजवळ गेला होता. या भेटीदरम्यान त्याने त्याला त्याची आंतरराष्ट्रीय विमानतळावर ओळख असून त्याने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना तिथे कायमस्वरुपी नोकरी मिळवून दिली होती. त्यामुळे त्याने त्याच्यासाठी नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती.

त्याच्यासह फैजान मुमताजउद्दीन काझी, मस्तान रहिम शेख, अमनकुमार कृष्णसहाय पांडे, शाजेब अनिस खान, मोहम्मद शारीक लईक खान या पाच तरुणांनी त्याच्याकडे नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी विलास ठाकरे याला फेब्रुवारी २०२४ ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत टप्याटप्याने ७ लाख २६ हजार ३०० रुपये दिले होते. काही दिवसांनी विलास ठाकरेने त्यांना जॉब ऑफर लेटर दिले होते. ते लेटर घेऊन रेहान व त्याचे पाचही मित्र एअरपोर्टला नोकरीविषयी विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडील जॉब ऑफर लेटर बोगस असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

एअरपोर्टला नोकरीचे आमिष दाखवून विलासने त्यांना बोगस जॉब ऑफर लेटर देऊन रेहानसह त्याच्या पाचही मित्रांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही, तसेच पैशांची मागणी केल्यास स्वतच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर रेहानसह इतर पाचजणांनी विमानतळ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून विलास ठाकरे याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी नोकरीचे बोगस लेटर देऊन सहाजणांकडून घेतलेल्या सव्वासात लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होतच विलास ठाकरे हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या विलासला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page