शेअरमार्केट गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने फसवणुक
पनवेल येथून तीनजणांच्या टोळीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – शेअरमार्केट गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची फसवणुक करणार्या एका टोळीचा पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी रायगढच्या पनवेल शहरातून तीन सायबर ठगांना पोलिसांनी अटक केली आहे. विपुल कमलाकर पाटणे, अनमोलकुमार रितेश शाही आणि शिवम ओमप्रकाश अशी या तिघांची नावे असून ते सर्वजण मूळचे छत्तीसगढचे रहिवाशी असून सध्या रायगडच्या पनवेल शहरात वास्तव्यास होते. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, विविध बँकेचे अकरा पासबुक, चौदा चेकबुक, दहा एटीएम कार्ड, युनिक इंटरप्रायजेस कंपनीचे स्टॅम्प आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जसबीरसिंग दाडीवाला हे अंधेरीतील मरोळ परिसरात राहत असून त्यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे. ठाण्यातील मानकोली नाका परिसरात त्यांची जेएस इंडस्ट्रिज नावाची एक कंपनी आहे. 6 मार्चला त्यांचा मोबाईल क्रमांक एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये त्यांच्यासह इतर काही सभासद होते, त्यात शेअरमार्केटसंदर्भात माहिती दिली होती. गु्रप अॅडमिन शेअरची माहिती सांगून अनेकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविले जात होते. 9 मार्च ते 17 मार्च 2025 या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये सुमारे पंधरा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीला त्यांना सुमारे सोळा लाखांचे प्रॉफिट झाल्याचे भासविण्यात आले होते. मात्र त्यांना ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. त्यासाठी ग्रुप अॅडमिनकडून त्यांच्याकडे विविध कारणासाठी पैशांची मागणी केली जात होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पश्चिम सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन संबंधित आरोपी पनवेल परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार गच्चे, पोलीस शिपाई विष्णू काळे, संग्राम जाधव, सुरेश लोकरे, मयुर इंगळे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून विपुल पाटणे, अनमोलकुमार शाही आणि शिवम ओमप्रकाश या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.
चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तपासात ते तिघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती उघडले होते. या बँक खात्याचा फसवणुकीसाठी वापर केला जात होता. या तिघांकडून मोबाईलसह विविध बँकेचे पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात नॅशनल सायबर क्राईम रिपोटींग पोर्टलवर देशभरातील 39 सायबर गुन्ह्यांत या बँक खात्याचा वापर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.