मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी कॉन्ट्रक्टरला बोरिवलीतून अटक
बोगस एमओयू बनवून मनपाकडून 29 कोटी 63 लाख उकाळले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कॉन्ट्रक्टर शेरसिंग राठोड याला बोरिवली येथून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. गाळ काढण्याचे बोगस एमओयू बनवून शेरसिंग राठोडने मनपाकडून 29 कोटी 63 लाख रुपये उकाळल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला शेरसिंग हा तिसरा आरोपी असून यापूर्वी याच गुन्ह्यांत मध्यस्थी म्हणून महत्त्वाची भूमिका बजाविणार्या केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी यांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत सिनेअभिनेता दिनो मोरियासह त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याचा स्वतंत्र तपास ईडीकडून सुरु आहे. दरम्यान या गुन्ह्यांत आगामी काळात काही बडे मनपा अधिकार्यासह खाजगी कंपन्यांचे संचालकावर अटकेची कारवाई होणार असल्याचे बोलले जाते.
मे महिन्यांत मिठी नदी पूर्नर्जिवितेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस येताच आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींमध्ये मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाचा समावेश होता. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी जागेचे नऊ बोगस करार तयार करण्यात आले होते. यातील बहुतांश करारामध्ये कंत्राटदाराच्या जागेवर दुसर्याच व्यक्तीने स्वाक्षरी होती, काहीवर कंत्राटदारची स्वाक्षरी नव्हती तर काही एमओयूवर तारीख टाकण्यात आली नव्हती. याबाबत संबंधित जागा मालकांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत या जागा मालकांनी अशा प्रकारे कोणताही करार केला नव्हता. अॅक्युट डिझाईन्स, कैलास कंन्स्ट्रक्शन, एन. ए कंन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर. एस इन्फ्रास्टक्चर आदी कंपनीच्या संचालकांनी बोगस एमओयू बनवून ते महानगरपालिकेत सादर केले होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या अधिकार्यांनी त्याची कुठलीही शहानिशा केली नव्हती.
मनपाच्या संबंधित अधिकार्यांनी स्वतच्या पदाचा गैरवापर करुन या बोगस निविदावरुन संबंधित कंपनीला सुमारे 65 कोटीचे पेमेंट करण्यास प्रवृत्त केले होते. या कंपन्यांनी प्रत्यक्षात मिठी नदीचा कुठलाही गाळ काढला नव्हता. तरीही या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट मंजूर करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पालिकेच्या तिन्ही अभियतासह मध्यस्थ आणि कंपनीच्या संचालकाच्या घरासह कार्यालयात छापेमारी करण्तया आली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज पोलिसांनी जप्त केले होते. त्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह आदीचा समावेश आहे. या कारवाईनंतर केतन कदम आणि जय जोशी या दोन मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली. या कशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले होते.
त्यांच्या चौकशीत शेरसिंग राठोड या कंत्राटदाराचे नाव समोर आले होते. त्याने मृत व्यक्तीच्या नावाने बोगस एमओयू बनवून ते महानगरपालिकेत सादर केले होते. 2021-2022 या वर्षासाठी त्याने मिठी नदीतून गाळ काढण्यासाठी मनपासोबत एक करार केला होता. त्याने मनपाला डंपरची एक यादी सादर केली होती. याच डंपरचा वापर गाळ काढण्यासाठी केला गेला. मात्र गाळ न करता त्याने विविध ठिकाणाहून कचरा गोळा केला आणि तो वाहतूक केला होता. तो कचरा गाळ असल्याचे सांगून त्याने मनपाला बोगस बिल सादर केली होती. त्यानंतर त्याला मनपाकडून 29 कोटी 63 लाखांचे पेमेंट करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या शेरसिंगला बुधवारी बोरिवली येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.