मिसिंग झालेल्या व्यक्तीची हत्या करुन पुरावा नष्ट केला

बहिणीची छेड काढली म्हणून हत्या केल्याची कबुली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – गेल्या चौदा दिवसांपासून मालाडच्या मालवणी परिसरातून मिसिंग असलेल्या फहीम नजीर सय्यद ऊर्फ फईम मचमच या 42 व्यक्तीची त्याच्याच चार परिचित सहकार्‍यांनी हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा मृतदेह मालाड येथील नाल्यात टाकून ते चौघेही पळून गेले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चारही मारेकर्‍यांना भायखळा पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर या तिघांचा ताबा मालवणी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान फहीमचा मृतदेह अद्याप सापडला असून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी मालवणी आणि कांदिवली पोलिसांनी मालाड येथील नाल्यात शोधमोहीम हाती घेतली आहे. मोहम्मद सैफ फयाज शेख, आजीम इम्रान खान, समीर कुरेशी आणि सुरज अरुण ठाकूर अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांविरुद्ध रात्री उशिरा कट रचून हत्या करणे आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

मालाडच्या मालवणी, अंबुजवाडी, आंबेडकर चौक परिसरात फहीम हा त्याच्या पत्नी रिदा हिच्यासोबत राहत होता. त्याला ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते. 17 एप्रिलला तो घरातून निघून गेला आणि परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही म्हणून त्याच्या पत्नीसह इतर नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला होता, मात्र तो कुठेच सापडला नाही. पाच दिवस शोध घेतल्यानंतर फहीमचा काहीच पत्ता लागला नव्हता. त्यामुळे 21 एप्रिलला त्याची पत्नी रिदा हिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर फहीम सय्यदच्या मिसिंगची तक्रार पोलिसांनी नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना फहीमची त्याच्याच परिचित आरोपींनी हत्या करुन त्याच्या मृतदेह एका नाल्यात फेंकून हत्येचा पुरावा नष्ट केल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार हर्षल देशमुख, पोलीस शिपाई राजेश पाटील, राकेश जाधव यांनी मालाडच्या मालवणी परिसरातून मोहम्मद सैफ, आजीम खान आणि सुरज ठाकूर आणि समीर कुरेशी या चौघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत मोहम्मद सैफने त्याची बहिणीची फहीमने छेड काढली होती, त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे सैफने इतर तिघांच्या मदतीने फहीमच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे 16 एप्रिलला फहीमला त्याच्या घरी आणून त्याला लाथ्याबुक्यांनी, कमरेच्या बेल्ट आणि हातोडीने बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली होती. या मारहाणीचा एका आरोपीने त्याच्या मोबाईलवरुन शूटींग केले होते.

फहीमच्या हत्येनंतर या चौघांनी त्याचा मृतदेह एका गोणी भरला. त्यानंतर परिसरात पार्क केलेल्या रिक्षातून त्याचा मृतदेह मालाड पश्चिमेकडील एका नाल्यात आणला होता. रात्रीच्या वेळेस त्यांनी ती गोणी नाल्यात फेंकून हत्येचा पुरावा नष्ट केला होता. या हत्येनंतर काहीच झाले नाही अशा अर्विभावात ते चौघेही वावरत होते. मात्र त्यांच्यातील एका पोलिसांना ही टिप दिली आणि हत्येचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चारही मारेकर्‍यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. या कबुलीनंतर चारही आरोपींना पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी मालाड येथील नाल्यातून त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे त्याचा मृतदेह सापडला नाही. गेल्याच आठवड्यात नाल्यातील कचरा वसईतील डपिंग ग्राऊंडवर पाठविण्यात आला होता. त्यामुळे तिथेही पोलीस पथक पाठविण्यात आले होते. दुसरीकडे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page