३३ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जप्रकरणी सहा आरोपी दोषी

सहाही आरोपींना २० वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२६
मुंबई, – सुमारे ३३ कोटीच्या एमडी ड्रग्जप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या सहाही आरोपीना विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून सर्वांना २० वर्षांच्या कारावासासह प्रत्येकी दोन लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये सचिन दिलीप बागुल, साजिद युसूफ इलेक्ट्रीवाला, चंद्रकांत कृष्णा काताडे, भगवान मोरे, आयुब खान ऊर्फ लाला आणि राहुल रमेश साळुंखे यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांतील सातवा आरोपी चाचा याचे सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. या टोळीचा साजिद इलेक्ट्रीवाला मुख्य आरोपी असून तो त्याच्या ओशिवरा येथील फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज बनवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अकरा वर्षांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने सर्व आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे.

अंधेरीतील ओशिवरा, श्रीजी हॉटेल परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चारकोप युनिटच्या अतिरेकीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी चारकोप युनिटचे सुभाष सावंत, संजय मराठे, विश्‍वासराव, नरेंद्र पाटील, अजय सावंत, अभय दुधवाडकर, नितिन कदम, लोपेश नखरेकर, चंदनशिवे, भगत या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या सचिन बागुल, साजिद इलेक्ट्रीवाला, चंद्रकांत काताडे आणि राहुल साळुंखे या चौघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी काही एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता.

चौकशीत साजिद इलेक्ट्रीवाला याने ओशिवरा येथील एकदंत इमारतीच्या प्लॉट क्रमांक ५०३ मध्ये अशाच प्रकारे एमडीचा साठा ठेवल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकून एमडी ड्रग्जचा कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी सुमारे ३३ कोटी रुपयांचा १५१ किलो एमडीचा साठा, त्यात पावडर, द्रव्य आणि कच्च्या स्वरुपात एमडीचा साठा जप्त केला होता. घटनास्थळाहून पोलिसांनी अन्य काही साहित्य आणि उपकरणे जप्त केले आहे. या ठिकाणी एमडी पावडर बनविली जात होती असेही पोलीस तपासात उघडकीस आले होते.

पंधरा दिवसांत हा संपूर्ण साठा मुंबईसह उपनगरात वितरीत होणार होता. मात्र त्यांच्या अटकेने त्यांचा प्रयत्न फसला गेला. या आरोपींविरुद्ध नंतर विशेष सेशन कोर्टात भक्कम पुराव्यानिशी आरोपपत्र सादर करण्यात आले होते. २०२३ साली काही आरोपींना कोर्टाने जामिन मंजूर केला होता. गेल्या अकरा वर्षांपासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती.

ही सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. सातपैकी सहाही आरोपींना कोर्टाने दोषी ठरविले. त्यानंतर या सर्वांना कोर्टाने २० वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी दोन लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रभारी शामल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश शाही, अंमलदार राम शिंदे, गुजर यांनी कोर्टात वेळोवेळी सबळ पुरावे सादर करुन आरोपीना शिक्षा होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page